Wednesday, 24 October 2018

गझल ३३

गजलेत 'किमान पाच' शेरच का?

मुळात उर्दूमध्ये मी तरी 'तांत्रिकदृष्ट्या गजल अशी असते, तशी असते' या स्वरुपाचे भाष्य वाचलेले नाही. जी काही आहे ती शायरी आहे किंवा समीक्षा आहे. जसे भटसाहेबांनी बाराखडी लिहून गजलतंत्र मराठी कवींना सांगीतले तसे उर्दूमध्ये कुणी व केव्हा सांगीतले हे मला ज्ञात नाही. खलील बीन अहमदने वृत्ते तयार केली, पण गजलतंत्र कुणी तयार केले असावे हे वाचायला मिळाले नाही.
काही मराठी लोक 'पंचमहाभूते' वगैरेचे दाखले देऊन 'पाच' या आकड्याला एकंदरच फार महत्त्व आहे असे सांगत गजलेतील पाच शेरांचे कारण निर्माण करतात. व्यक्तीशः मला ते पटत नाही.
उर्दूमध्ये असे मात्र म्हंटले गेले असावे की 'किमान पाच व जास्तीतजास्त कितीही' किंवा 'किमान पाच व जास्तीतजास्त अकरा किंवा सतरा' शेर असतात. तसेच, शेरांची संख्या विषम असावी असेही उर्दूमध्ये म्हंटले गेले असावे.
एक असे मत आहे की गजल ऐकायला येणारे रसिक विविध वयाचे व विविध क्षेत्रातील असल्यामुळे प्रत्येकाला 'आपलासा' वाटणारा एक शेर मिळावा या दृष्टीने गजलेत किमान तेवढे शेर ठेवत असावेत. पण हेही तितकेसे पटत नाही.
अर्थात, आपले आपल्यालाच ताडावे लागते की 'किमान पाच' शेर हा नियम कुठून आला असावा.
१. एखाद्या रचनेला किमान कविता म्हणण्याइतक्या, म्हणजे दहा तरी ओळी असाव्यात या दृष्टीने असे असावे. अन्यथा, फक्त मतला रचूनही त्याला गजल म्हंटले गेले असते. तसेच, एखाद्या शेरालाही म्हंटले गेले असते. मग त्याच्यातून काहीच निष्पन्न झाले नसते. ना रसोत्पत्ती ना कवीच्या प्रतिभेचा आविष्कार!
२. रुबाई चार ओळींची असते व कतआ म्हणजे गजलेतील कोणतेही दोन शेर! हे प्रकार गजलेच्या आधी निर्माण झाले की नंतर हे मी वाचलेले नाही. पण उघड वाटते की नंतरच निर्माण झालेले असावेत. यांच्यापेक्षा गजल किंवा गजलेपेक्षा रुबाई वेगळी असण्याचे कारण बहुधा ओळींची मांडणी ( म्हणजे दोन ओळी की चार ओळी असे ) व ओळींची संख्या असावे.
३. मतला व मक्ता घ्यायचे म्हंटल्यावर 'सुट्टे काही शेर तरी पाहिजेत' या विचाराने कदाचित असे झाले असावे.
४. हा काव्यप्रकार निश्चीत करतानाच मुद्दाम हा निर्णय घेण्यात आला असावा. काव्यप्रकाराला काही निश्चीत स्वरुप असावे या उद्देशाने!
५. कवीला एकाहून अधिक विषयांवर भाष्य करता यावे किंवा एकाच विषयावर भिन्न पद्धतीने भाष्य करता यावे या विचाराने असे करण्यात आले असावे.

No comments:

Post a Comment