Friday, 26 October 2018

गझल २४

गजल व इतर कविता यातील फरकः
१. तांत्रिक फरक - गजल ही किमान पाच, स्वतंत्र अर्थाच्या व एकमेकांवर विसंबून नसलेल्या गजलतंत्रातील द्विपदींची मालिका असते. कवितेला किती ओळी असाव्यात, किती कडवी असावीत, वृत्त / छंद असावा की नसावा, ओळींची रचना कशी असावी, प्रत्येक ओळ वेमात्रांमध्ये गळी असावी किंवा नसावी याबाबत काहीही नियम नाहीत.
२. आशयासंबंधातील फरक - गजलेत गजलकाराच्या अनुभुतींवर त्याने केलेले असे भाष्य असते ज्यातून एक विचार, एक भावना, एक संवेदना भिडते. कवितेत वाट्टेल तो विषय असू शकतो.
या फरकांमधून असे कुठेही म्हणायचे नाही की कविता गजलेइतकी श्रेष्ठ नाही. कुठलीही गजल मुळात कविताच असते. फक्त ती गजल तंत्र पाळते. श्रेष्ठत्व हे तंत्रावर अवलंबून नाही की आशयावर! श्रेष्ठत्व अवलंबून आहे काव्यातील विचारांवर! फक्त, गजल व कविता यांचा आस्वाद घेताना आस्वादकाची भूमिका वेगवेगळी असणार हे सांगण्यासाठी हे फरक नोंदवले आहेत.
लावणीत शृंगाररस, पोवाड्यात वीररस, अभंग / ओवीमध्ये भक्तीरस मिळतो. तसा गजलेत 'जीवन-रस' मिळतो.
गजल हे मनातून आलेले व मनोव्यापारांशी निगडीत असणारेच काव्य असते. कविता कशावरही असू शकते.
==========================================
गजलियत

गजलियत हा शब्द जरी गजल या शब्दावरून आल्यासारखा वाटला तरी तो फक्त गजलपुरता मर्यादीत नाही. गजलियत कशातही असते. प्रेयसीच्या नखऱ्यांमधे, अदांमधे, दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमधे, कवीच्या आयुष्यामधे, गद्य लिखाणामधे, कुठल्याही कवितेमधे, कोणत्याही संवादात किंवा कृत्यात गजलियत असू शकते. गजलियत ही एक वृत्ती आहे. वृत्तीतून निर्माण होणारी 'काव्यात्मक पातळी' आहे जिच्यावर कवी किंवा आस्वादक रेंगाळून धुंद होऊ शकतो.
गजलियत म्हणजे 'काव्य' मात्र नाही.
काव्य व गजलियत यातील रेषा लक्षात यावी यासाठी उदाहरण!
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात... क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत
या कुसुमाग्रजांच्या ओळींमध्ये काव्य आहे. प्रेयसी आज स्वतःच धुंद होऊन प्रियकराच्या गळ्यात हात टाकून बसली आहे. पहाट होत आहे याचे तिला भानच नाही. समाजाला आपले प्रेम समजू नये यासाठी कवी तिला सरळ 'आता जा' असे म्हणत नसून 'तुझे चांदण्याचे हात माझ्या गळ्यातून काढ' असे सांगत आहे. म्हणजे, हे हात माझ्या गळ्यात असण्याची योग्य वेळ 'चांदणे' असतानाची आहे हेही सुचवले जात आहे व ते सुंदर पद्धतीनेही सुचवले जात आहे. हळूहळू जवळ येणारी किरणे आता दिसायची वेळ झाली आहे. ते आपले प्रेम समाजासमोर उघड करण्याची शक्यता आहे. यासाठी 'दिवसाचे दूत' हा शब्दप्रयोग केलेला आहे. यातच, कवीला तिच्या सहवासाची तितकीच ओढ आ,हे मात्र आता भान ठेवायची वेळ आली आहे हे सुचवले जात आहे. सरळ आशयाला सुंदर पद्धतीने मांडणे म्हणजे काव्य! यात आशय फार खोल असेलच असे नाही.

No comments:

Post a Comment