अंधार पेलताना
वाती विझून गेल्या
थोडे कुठे कवडसे
बाकी कळ्याही मेल्या
आतून पेटताना
जळले शरीर थोडे
सिमेवरी पहारा
देतात लोक वेडे
त्यांच्या घरी दिवाळी
घेऊन काळ आली
आता कुठून यावा
संसार साथ वाली
पणती तरीही दारी
जळते उदासवाणी
ओठांवरी हसू ना
डोळ्यांत मात्र पाणी
विझला दिवा कुलाचा
होती आशा जराशी
घेऊन माय रडते
अस्थी कलश उराशी
माती इमान सांगे
त्याचे चराचराला
देऊन अश्रू दान
गेला घराघराला
© रमेश
No comments:
Post a Comment