Friday, 26 October 2018

गझल २९

परभाषिक शब्दांचा अंतर्भाव

गजलेत अनेकवेळा प्रचलीत आहेत म्हणून परभाषिक शब्द घेतले जातात. मुळात 'इरादा' हा शब्द मराठी नाही, पण तो गजलेत घेतला गेलेला आढळतो. तसेच, टेबलाला उगीच कुणी 'मेज' म्हणून गजलेत घेण्यात काही अर्थ नाही हेही खरे.
याबाबत निश्चीत असे लिखाण जरी फारसे उपलब्ध नसले तरी सर्वमान्य विचारांप्रमाणे जाता येते. ते विचार खालीलप्रमाणे
१. जो परभाषिक शब्द मराठीमध्ये 'मराठी पर्यायी शब्दाहून किंवा जवळजवळ तितकाच ' प्रचलीत आहे तो घेता येतो व घेतला जातो.
२. जो परभाषिक शब्द मराठी रसिकाला बऱ्यापैकी नियमीत परिचयाचा आहे तोही घ्यायला हरकत नाही.
३. जे परभाषिक शब्द मराठीत प्रचलीत नाहीत ते गजलेत घेतले जात नाहीत. म्हणजे, जू-ए-शीर, खून (रक्त या अर्थी )वगैरे!
४. जे परभाषिक शब्द आपल्या संस्कृतीशी निगडीत नाहीत ते सहसा गजलेत नसतात. जसे, साकी, हिज्र वगैरे!
५. इंग्रजी शब्दांनी जरी गजल आधुनिक होत असली तरी शक्यतोवर इंग्रजी शब्द टाळलेले बरे!
भाषा हे जरी संपर्काचे व संवादाचे माध्यम असले व आजच्या समाजाला हिंदी व इंग्रजी व्यवस्थित ज्ञात असले तरी गजलेला एक मातृभाषिकपणा ठेवणे आवश्यक आहे.
===========================================
मतला व मक्ता

गजलच्या पहिल्या शेराला मतला म्हणतात हे आपण पाहिले आहे. मतला म्हणजे तो शेर ज्यात गजलेची जमीन स्पष्ट होते. म्हणजे, या विशिष्ट गजलेत कोणते वृत्त, कोणता काफिया, काय अलामत व कोणती रदीफ आहे हे स्पष्ट होते. हे स्पष्ट होण्याचे कारण म्हणजे 'मतला' या शेरातील दोन्ही ओळीत रदीफ, काफिया व अर्थातच काफियाबरोबरची अलामत येते व दोन्ही ओळी कोणत्या वृत्तात आहेत ते लक्षात येते.
कवीमनाला जेव्हा एखादी अनुभुती छेडत असते तेव्हा कवीला त्यातून एखादी कल्पना, एखादी ओळ, एखाद्या विशिष्ट वृत्तात सुचून जाते. गजल ही सर्वसाधारणपणे ९० % कारागिरी असलेली व १० % मूळ (ओरिजिनल ) असलेली कविता असते. ज्या कवीच्या बाबतीत कारागिरी ५० % व मूळ ५० % होईल तो खूपच श्रेष्ठ कवी म्हणायला हरकत नाही. याचे कारण एखाद्या गजलेतील 'सर्व अनुभुती, सर्व कल्पना, सुचतानाच एकाच वृत्तात सुचतील' हे होणे कठीण आहे. एखादी ओळ संपूर्णपणे मूळ असणे सहज शक्य होते. पण सर्वच ओळी मूळ स्वरुपात जशा सुचतील तशाच गजलेत सूट होणे कठीण असते. समजा अशा पाच भिन्न कल्पना किंवा अनुभुती आपोआप शब्दरूप घेऊनच मुखातून बाहेर आल्या तरीही त्या एकाच वृत्तात येतील असे नाही. त्यातून पाच भिन्न गजलांचे भिन्न शेर निर्माण जरूर होऊ शकतील. पण एक गजल रचण्यासाठी जे पाच शेर लागतात ते गजलेच्या तंत्राच्या मर्यादांमुळे कवीकडून कारागिरीची प्रचंड अपेक्षा करू लागतात.
अशा वेळी कारागिरीच १०० % असलेले शेर निर्माण होणार नाहीत हे बघायला लागावे.
पण या सर्वामुळे व पाच शेर रचण्याचे बंधन असल्यामुळे कवी कारागिरी वाढवत नेतो. त्यामुळे मूळ कल्पनेला तडा जातो असे नाही. पण मूळ कल्पना बऱ्याचदा सांकेतिक पद्धतीने उलगडून समोर येते. म्हणजे, 'चांदणे' म्हंटले की प्रेम किंवा विरह याचा उल्लेख आहे हे रसिक जाणायला लागतो. याचप्रमाणे, सांकेतिक भाषा वापरल्यामुळे बरेचदा मूळ कल्पनेव्यतिरिक्तही काही इतर अर्थही त्या शेरातून निघायला वाव राहतो.
मात्र, प्रत्येक सुचलेली ओळ किंवा कल्पना ही मतल्यातच गुंफली पाहिजे असे नाही किंवा तसे करता येईलच असे नाही. म्हणजे, एखादी कल्पना पूर्णपणे मांडून व्हायला दोन ओळी लागतात. (लागायला हव्यातही.) अशा वेळेस दुसरी ओळ पूर्ण होताना आपल्याला गजलेचे काफिया व रदीफ, तसेच वृत्त सुचवून जाते. ते सुचल्यावर कवी दुसरी एखादी अनुभुती त्याच जमीनीत कशी मांडता येईल याचा विचार करू लागतो.अशा पद्धतीनेही काही वेळा गजला तयार होतात. यात काहीही चूक नाही. कारण गजल मुळात बरीचशी कारागिरीवर अवलंबून असते. नेमक्या याच कारणाने 'मुक्तछंद' इतर कुठल्याही अनावश्यक शब्दांचा किंवा प्रतिमांचा सहारा न घेता सरळ सरळ भिडताना दिसतो. याचमुळे मुक्तछंद ते गजल हा प्रवास कवी तंत्रात पक्का झाला आहे व विचार मांडण्यासाठी हुकुमीपणे तंत्राचा वापर करू शकत आहे याचा निदर्शक असतो.

No comments:

Post a Comment