Wednesday, 24 October 2018

गझल २७

उदाहरणः
समजा मतल्यात आजार व बाजार असे काफिया आले तर पुढील शेरांमध्ये त्यातील 'जार' कॉमनच राहायला पाहिजे. पण त्यासारखे शब्द जर कमी असले तर काय? मग मतल्यातच मुळात असे काफिया वापरावेत (अर्थातच, मतलाच बदलणे जरुरीचे होते ) की पुढे नुसते 'आर' आले तरी चालेल, 'जार' नसले तरी चालेल. पण समजा शायराने भर मुशायऱ्यात जर सांगीतले की मी मुद्दाम एक शेर 'व्यापार' असा काफिया वापरून करत आहे व ते माझ्यासाठी जरुरीचे आहे तर त्याला कोण हरकत घेणार आहे?
मराठी भाषेत (देवनागरी लिपीमुळे ) हा सुटींचा प्रश्न कवींना जास्त भेडसावतो. उर्दूमध्ये 'सा' हे अक्षर उदाहरणार्थ 'स + आ' असे काहीसे लिहिण्याची पद्धत असावी, ज्यामुळे फक्त 'आ' हा काफिया ठरू शकतो व 'स' माफ होतो.
५. भटसाहेबांचा एक मतला व त्या गजलेतील नंतरचा एक शेर पाहुयात.
तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही
थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका--
'अजून गा रे.. अजून गा रे .. अजून काही..'
आता मतल्यात किनारे, तारे असे काफिया, म्हणजे 'आरे' हा अक्षरसमूह कॉमन व एकाच शब्दाचा भाग असे प्रस्थापित झाले आहेत.
मात्र, पुढील शेरामध्ये 'गा रे' हे दोन शब्द आहेत तरीही त्यांच्यात 'आरे' हा उच्चार कॉमनच आहे. वास्तविक पाहता काफिया हा एकच शब्द असू शकतो. पण मुळात काव्य व त्यातही गजल ही नादसाधर्म्याने नटलेली कविता असते. त्यात अशी सूट घेण्याने उलट लज्जत वाढतेच. उर्दू गजलांमध्ये हे कित्येक वेळा झालेले आहे.

No comments:

Post a Comment