शेवटी, गजलियत असेल तर गद्य लिहिले तरी आवडणारच. आपण सर्वमान्य तंत्र पाहात आहोत म्हणून ही चर्चा!
गजलच का?
कोणत्याही कवीला हा प्रश्न पडू शकेल. काव्यच लिहायचे तर ते गजलेच्या माध्यमातून का लिहायचे? इतके तांत्रिक काव्य लिहिण्यापेक्षा आम्ही ओवी लिहू, लावणी लिहू, भावगीत लिहू, मुक्तछंद लिहू!
एकदा रसिकांचीही पावती घेऊन पाहावी.
मी पाहिलेल्या अनेक कविसंमेलनांमध्ये 'केवळ शेवटी काफिया व रदीफच्या समेवर ओळ आली' याची जाणीव होऊनच रसिक मुक्त दाद देतात. शेराचा अर्थ काय होता, त्या अर्थात काही दडलेले होते काय वगैरेवर विचार करणे एखाद्या भरगच्च संमेलनात शक्य होईलच असे नाही. पण एक नादसाधर्म्य व लयबद्धता असल्यामुळे मुळातच गजल भाव खाऊन जाते.
पण हे काही गजल करण्याचे कारण असू शकत नाही.
गजल करण्याचे कारण असते 'कोणताही अनावश्यक व वरवर काव्यात्मक वाटणाऱ्या शब्दांचा अनावश्यक भरणा न करता सूचकपणे आपली जीवनानुभुती व मनस्थिती विविध विषयांच्या माध्यमातून प्रदर्शित करणे '!
गजलेत एकाचवेळी तंत्राची मर्यादा व पाच भिन्न विषयांवरील कविता करण्याची मुभा यांचे काँबिनेशन असते. कोणत्याही काव्यप्रकारात हे सहसा होत नाही. म्हणजे, स्वातंत्र्यवीरांवर केलेल्या कवितेत तोच विषय शेवटपर्यंत येणार. पण गजलेत असे करण्याची गरज नाही. म्हणजेच, एकाचवेळी तंत्राने बांधणारी पण आशयाआबत मुक्त होणारी अशी ही कविता आहे.
गजलेत बहुतांशी कोणत्याही विषयावर भाष्य करता येते. लावणीमध्ये 'विठ्ठल भेटतच नाही' ही भावना येत नाही. अभंगात 'भावजी दमांनं' म्हणणे योग्य ठरणार नाही. भावगीतात 'काय हे आजकालचे भ्रष्ट नेते' असे म्हणणे योग्य ठरणार नाही.पोवाड्यात 'संसार मांडते मी' म्हणणे किंवा 'धुंदी कळ्यांना' म्हणणे विचित्र वाटेल. गजलेवर हे असले अंकुश नाहीत. विषय कोणताही असो, ती आपल्या स्वतंत्र ढंगाने कवीला बोलके करत भावना रसिकांपर्यंत पोचवते.
म्हणून ...... 'गजल'!
Wednesday, 24 October 2018
गझल २८
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment