Wednesday, 24 October 2018

गझल ३

प्रेयसीच्या नावाने कपडे फाडून फिरणारा आणि शायरी करणारा म्हणजेच गझलकार अशी टीका करणार्‍यांना या भयानक परिस्थितीत निर्माण होऊन रुजू पाहणार्‍या गझलेचे माधुर्य जाणवले नसावे.
लहानपणापासून अस्थैर्य, मारहाण, खून खराबा पाहणे, त्यातच कुठेतरी जीव जडणे, मात्र ते व्यक्तही करता यायच्या आधीच ताटातुट होणे आणि त्यानंतर 'गमे-रोजगार' म्हणजे उदरनिर्वाहासाठी दु:खे झेलतानाच त्या जुन्या तरल आठवणींनी मनात गर्दी करणे, पुन्हा जुने प्रेम अकस्मात भेटणे, एखादेच मीलन, त्यानंतरही ताटातुट, व्यसनाधीन होणे, कफल्लक किंवा कर्जबाजारी होणे, मयखान्यात जिंदगी गुजारणे, दारू पिऊ नका आणि प्रेमात पडू नका सांगणार्‍या धर्मोपदेशकांची खिल्ली उडवण्याची मानसिकता तयार होणे, मृत्यू समीप आल्याचे जाणवणे
... आणि या सर्व तीव्र आणि वेदनादायक अनुभुतीतून गझल रचणे!
आजच्या आपल्या शासनप्रणालीत कवितेला राजाश्रय नाही. ज्ञानपीठ वगैरे केवळ पुरस्कार आहेत. त्या मुघल संस्कृतीतच नव्हे तर अगदी शिवरायांच्या शासनातही कवींना राजाश्रय असायचा. कवी भूषण हा त्याचा पुरावा!
पठाणांनी केलेल्या भयानक हिंसक लुटीमुळे मोडकळीस आलेल्या दिल्लीतील मुघलांचे साम्राज्य नामधारी राहिलेले होते. औरंगजेबानंतर हिंमतवान राजाच लाभलेला नव्हता. मात्र हे लाल किल्यातील राजे विलासी तेवढे होते. पण त्यांच्यातील शेवटचा राजा, बहादुरशहा जफर हा स्वतःच विद्वान कवी होता. त्याने शायरीला राजाश्रय दिला. आणि तेच युग गझलेचे आजवरचे सर्वात महत्वाचे युग ठरले.
जफरच्या आधीही अनेक शायर होते. मीर दर्द, सौदा, वगैरे! हे श्रेष्ठच होते. पण त्या काळातील मीर तकी मीर हा आजही गझलेचा सम्राट समजला जातो.
सम्राट जफरच्या काळात स्वतः गालिब, जौक, मोमिन हे शायर झाले. जौकचा शिष्य दाग देहलवी हा तुफान लोकप्रिय ठरला. त्यानंतर 'दाग स्कूल'चे अनेक शायर झाले. आजही ती परंपरा बर्‍याच मोठ्या प्रमाणावर आहे. जिगर, मजाज, शकील, साहिर हे अलीकडचे शायर!
टप्याटप्याने गझल काहीशी बदलत गेली. सुरुवातीला प्रेमालाप करणारी गझल हल्ली जदीद, म्हणजे आधुनिक रूप घेऊन समाजावर भाष्य करते.
मात्र जवळपास सहा शतकांचा अनुभव पाठीशी असल्याने उर्दू गझलेत अनेक संकेतात्मक शब्दप्रयोग आहेत. जसे शमा परवाना, गुलो बुलबुल वगैरे!
मराठी गझल तरुण असल्यामुळे अजून तितकेसे संकेत निर्माण झालेले नाहीत.
मात्र, मागे वळून पाहिल्यास असे दिसेल की:
- गझल हा काव्यप्रकार कृत्रिम आहे व परकीय आहे, मात्र त्यातील आशय कोणत्याही संस्कृतीला आपलासा वाटू शकतो इतकेच नाही तर तो डोक्यावरही घेतला जातो.
- उर्दू गझल वाचून लक्षात येईल की भावनांची पराकोटीची तीव्रता अत्यंत दैनंदिन भाषेत काहीश्या मिश्कील आणि बर्‍याचश्या प्रभावीपणे व्यक्त केली जाते. हे गझलेचे लक्षण मानायला हवे.
- प्रेमकाव्य हे गझलेचे प्राथमिक स्वरूप होते व ते आजही आहेच! गझल हे हाडामांसाच्या माणसाचे काव्य आहे. यात कवी जे म्हणतो तीच अनुभुती लाखोंना आलेली असू शकते. 'अरे? हे आपणही अनुभवलेले आहे' असे वाटून उत्स्फुर्त दाद देण्यास गझल कारणीभूत ठरू शकते. मानसिक वेदना हा गझलेचा पाया आहे असे दिसते तर त्या वेदनांचा सोहळा साजरा करून चेहरा आनंदी असल्याचे भासवणे हा गझलेचा कळस! अर्थात, या स्वरुपात खूपदा बदलही घडू शकतोच!
- आज आपल्याकडे शायरीचे युग नाही. मात्र गालिब, जौकच्या काआत शायरीचे युग होते. चौकाचौकात लोक शायरीवरच चर्चा करायचे. मोठाल्ले मुशायरे घडायचे दरबारात! त्यातूनच राजकारणही निर्माण व्हायचे. हझल व तरही गझल हे त्याचेच परिणाम म्हणता येतील. हझल ही अनेकदा हास्योत्पादक, द्वयर्थी शेर असलेली असते तर तरही गझल म्हणजे स्पर्धा म्हणून एकाचवेळी शायरांना एक ओळ देऊन त्यावर त्यांच्याकडून मुशायर्‍यात जाहीर व उत्स्फुर्त गझल ऐकणे! जौकचा शिष्य 'दाग' हा नेमका याच प्रकारात सरस ठरला. अनेकांच्या मते त्याची शायरी जबान बयान शायरी आहे. म्हणजे शब्दांची करामत! मीरसारखा हेलावणारा आशय त्याच्याकडे नाही.
-देहलवी व लखनवी हे उर्दू शायरीचे दोन महत्वाचे महाल! त्यात देहलवी श्रेष्ठ समजला जायचा. देहलवी शायर विरहावर प्रेम करणारा व त्याच्यावरच प्रभावी भाष्य करणारा तर लखनवी शायर केवळ प्रेयसीच्या सौंदर्याचे वर्णन करणारा असा साधारण फरक होता.
- गझल हा काव्यप्रकार कृत्रिम असल्यामुळे अर्थातच अनेक गझलकारांचा प्रवास खालीलप्रमाणेच होतो.

No comments:

Post a Comment