Wednesday, 24 October 2018

गझल १४

वृत्ते म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून लघू व गुरू अक्षरांचा ठराविक क्रम आहे. वृत्ते आपली आपणही बनवता येतात. मात्र, शक्यतो शेवटी गुरू अक्षर असलेली वृत्ते व अर्थातच लयीत / ठेक्यात उच्चारता येणारी वृत्ते चांगली वाटतात. हजारो वृत्तांची माहिती माधवराव पटवर्धनांनी त्यांच्या छंदोरचना या जाडजुड पुस्तकात दिलेली आहे. त्यात आठ वेळा ’लघू’ व नंतर दोन गुरू वगैरे अशा स्वरुपाची वृत्ते व त्यांतील कवितांची उदाहरणेही आहेत. मात्र, अशी व्रुत्ते गज़लेत वापरायला अवघड पडतात. याचे कारण आठ वेळा लघू अक्षरे एकामागोमाग घेणे हे गज़लेसारख्या काव्यप्रकारासाठी दुष्कर आहे. वापरायला कोणीच काही म्हणू शकत नाही. पण ’गडद गडद नभ होते’ सारख्या ओळी बर्‍याचदा निसर्ग किंवा इतर काही वर्णनांसाठी चांगल्या वाटतात.
वर दिलेल्या वृत्तांव्यतिरिक्तही अनेक वृत्ते गज़लकार सातत्याने वापरताना दिसतात.
वृत्तांना वृत्तीही असते असे वाटते. काही काही वृत्ते फ़ारच बोलकी, काही फ़ारच आक्रमक, काही प्रेमालापासाठी योग्य अशी जाणवू शकतात. मात्र, हे विधान मी ’गज़लेचा कायदा’ म्हणून लिहीत नसून फ़क्त मनातील विचार म्हणून लिहीत आहे. उदाहरणार्थ, कलिंदनंदिनी हे वृत्त फ़ारच लाघवी आहे व प्रेमालापाच्या अभिव्यक्तीसाठी उत्तम भासते. आनंदकंद बयापैकी स्पष्ट विचार मांडणारे, थोडे आक्रमक वाटावे असे आहे. भुजंगप्रयात खूपच बोलके वाटते. भुजंगप्रयातमधे आपण नेहमी बोलतो तसे बोलल्यासारखे वाटते. मात्र, ही सर्व मते म्हणजे ’नियम’ नाहीत. कुठल्याही वृत्तात परिणामकारकपणे विचार मांडणे जमणे आवश्यक आहेच.

No comments:

Post a Comment