Wednesday, 24 October 2018

गझल ३०

मी एक शेर रचला होता. मला २००५ मध्ये झालेल्या अपघातात मुंबई पुणे महामार्गावर मी गाडीत एकटाच अडकून पडलेलो होतो व माझ्या डाव्या गुडघ्याचा चक्काचूर झालेला होता. मी इतर गाड्या थांबाव्यात व मला मदत मिळावी यासाठी माझ्या गाडीतून हात बाहेर काढून तब्बल अर्धा तास थांबलो होतो. पण सगळेच प्रचंड वेगात जात असल्यामुळे कुणाला कळतच नव्हते की या गाडीत कुणी आहे, किंवा कळले तरी थांबणेच शक्य नव्हते. तब्बल चार वर्षांनी त्या घटनेची पुन्हा आठवण झाली तेव्हा मला दोन ओळी जवळजवळ ४० ते ५० % आहेत तशाच सुचल्या.
घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी
यातील 'घातली मी साद' ऐवजी प्रथम मला 'लागले हृदयास' सुचले होते. 'हृदयास लागणे' हे मला 'पायाला लागणे' या वरून सुचले होते. 'थांबले नाही कुणी' हे तसेच्यातसेच सुचले होते. या 'थांबले नाही कुणी'ने मला एकाच ओळीत काफिया व रदीफही सुचवून टाकले होते. 'आपले नाही कुणी' हे मला काही क्षण विचार केल्यावर सुचले. 'चांगले आहेत सारे' हे तीन शब्द आणखीन थोडा विचार केल्यावर सुचले. अचानक एक मतला तयार झाला. पण बहुतांशी वेळा असा मतला तयार झाल्याचा अनुभव मला नाही. तसेच, मी 'घातली मी साद' ऐवजी 'लागले पायास' असे लिहिले असते तर तो मतला अशक्त झाला असता. या उदाहरणातून मला कारागिरी व मूळ कल्पना यांचे नाते दाखवायचे होते.
तेव्हा, सुचलेल्या कल्पनेचा मतलाच झाला पाहिजे असेही नाही व मतलाच सुचावा याचा प्रयत्न कवीने करणेही योग्य नाही. एक दोन कल्पना मनात रेंगाळल्यावर हळूहळू त्यावरचे उघड भाष्य मुखातून येतेच. मग कारागिरी करून दोन शेर करता येतात.

No comments:

Post a Comment