. *महामारी*
गाव गाठण्यासाठी सगळे धडपडत होते
पोटाची खळगी भरण्याचा
भरवसा असलेली मशिनेच बंद झालीत
या शहरातली नि वस्तीतलीही
मजूर, कारागीर, कामगार
जमेल तितकं सामान आणि
असतील सोबत तर बायको-मुले घेऊन
जिथून तोडली होती नाळ जगण्यासाठी
जीव गुंतलेलाच होता त्या
एकर-दोन एकर, बिगाभर जमिनीत
पेरणीपासून खळ्यापर्यंतचा प्रवास
ज्वारी-बाजरी, भात-मका, गहू-हरभरा
निंदणी-खुरपणी, पैरा-वाटण्या,
तंटा-बाचाबाची, हातघाई-हाणामारी
कधी सग्यांसोबत, तर कधी परक्याबरोबर
दाराघरांत-रानामाळात-लग्नमंडपात
दुष्काळ-महापुरातही
दादा-अण्णा, बापू-अप्पांनी
केलेली मध्यस्ती आणि दिलजमाई
जिथून तोडली होती नाळ जगण्यासाठी
नाहीतर इथं सलाईनवरचे मढी होऊन
टाचा घासत तडफडण्यापेक्षा
लाख बरे !
नुकतीच रुजत आलेली
सगळी पाळंमुळं तोडून चाललेत
"मायभूमीतल्या मातीतच सोडू
अखेरचा श्वास" या निर्धाराने.
*रमेश*
_(गुलज़ार यांच्या 'महामारी'चा मुक्तानुवाद)
No comments:
Post a Comment