Wednesday, 11 July 2018

जलचक्र

.      *जलचक्र*

नदी तळे तलाव आणि
समुद्रातील साठ्याची
सूर्याच्या उष्णतेने
वाफ होते पाण्याची

वाफ म्हणजे पाण्याचेच
एक वायूरूप असते
मात्र आपल्या डोळ्यांनी
ते नेहमी दिसत नसते

वाफेचे बनतात ढग
हलके होऊन वर जातात
वारा जेव्हा वाहतो तेव्हा
हळू पुढे पळू लागतात

ढगांना भेटतात डोंगर
तिथली हिरवी झाडे
थंड हवा लागताच ते
होतात खूप जाडे

थेंब थेंब गळू लागतात
त्यालाच म्हणतात पाऊस
पावसात भिजायची
मुलांना खूप हौस

पाऊस धुके दव दहीवर
हीही रूपे वृष्टीचीच
शोभा असतात वाढवत
हिरव्यागार सृष्टीची

गटर नाले नदीत मजेत
हे पाणी वाहत असते
शेवटी जाऊन समुद्राला
आपोआप मिळत असते.

समुद्राच्या पाण्याची
वाफच वाफ होते पुन्हा
याला म्हणतात जलचक्र
धरतीसाठी अमृतपान्हा

.      *चंद्रकांत निकाडे*

No comments:

Post a Comment